Wednesday, February 25, 2009

गेली निघून आई.


अष्टभुजा घरी आली आणि बालविनायकाला एक स्वप्न पडले. त्यानं ते आपल्या आईला सांगितलं, "आई, माझ्या स्वप्नात देवी आली अन् म्हणाली, 'मला तुझा बळी हवाय"

आईच्या मनावर वज्राघातच झाला. ती देवापुढे बसली. काकुळतीने म्हणाली, "हा माझा गोजिरवाणा गोळा का मागतेस? देवी, देवी अष्टभुजे भवानी देवी, माझा बळी घे, माझा बळी घे"

आईने पुढचं नवरात्र काही पाहिलं नाही. मध्यरात्र झाली होती. अंधार दाटला होता. बालविनायक अष्टभुजेपुढे बसला होता; स्फुंदत होता. विश्वजननीला सांगत होता, "देवी तुझ्यापुढे गे, मी बैसलो कधीचा तव निर्विकार मुद्रा, का गे कठोर होई? - गेली निघून आई । "

 
देवी तुझ्यापुढे गे, मी बैसलो कधीचा
तव निर्विकार मुद्रा, का गे कठोर होई?
- गेली निघून आई !ध्रु.

का घेतला बळी तू ?
तव काय सांग हेतु
जाता सुवासिनी ती लक्ष्मी निघून जाई!१

ते स्फुंदतात बापू
देवी नकोस कोपू
पिल्लांस सोडण्याची राधेस का गं घाई?२

सौभाग्य ते निमाले
निस्तेज धाम झाले
छाया अमंगलाची भिववीत मात्र राही!३

आई तुझ्या विना गे
काही न गोड लागे
काळोख दाटलाहे - ओसाडल्या दिशाही!४

हव्यास जर बळीचा –
का घेतला न माझा?
माझा बळी सुखे घे, दे तू घरास आई
ठेवीन पायि डोई - दे गं घरास आई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

No comments:

Post a Comment