पुण्यात त्यावेळी दोन यमदूतांनी थैमान घातलं होतं. एक यमदूत होता प्लेग आणि दुसरा रँडसाहेब.
चापेकरांनी रँडसाहेबाचा बळी घेतला. परिणाम व्हायचा तोच झाला. १८ एप्रिल १८९८ त्यादिवशी सकाळी दामोदर चापेकरांना फाशी देण्यात आली - केसरीतील ती वार्ता बालविनायक वाचत होता. केसरीचा अंक अश्रूंनी भिजून गेला - तरी वाचन संपलच नव्हतं.
बालविनायक भारावून गेला. उठला नि अष्टभुजा देवीसमोर जाऊन बसला. हात जोडले... डोळे मिटले.
वधस्तंभाची वाटचाल करणारे चापेकर त्याला दिसू लागले. अष्टभुजा देवीच्या ठिकाणी स्वातंत्र्यलक्ष्मी, साकार झाली, त्या तेजस्वी मूर्तीच्या पावलांवर त्याला फुलं दिसू लागली... चाफ्याची हसरी फुलं दिसू लागली. चाफ्याची फुलं? छे क्रांतिकारक चापेकरांची शिरकमलं होती ती. तो पुटपुटला.
अलगद पडली तव चरणांवर चाफ्याची ही फुले
ती तर, हसरी शिरकमले!ध्रु.
अश्रू नयनी संतत येती
संतापे परि मुठी वळताती
स्वतंत्रतेच्या यज्ञाचे तर होमकुंड पेटले!१
एक करिन ही धरती अंबर
घण घालिन गे परसत्तेवर
सूड रिपुचा पुरा घ्यावया, मन माझे चेतले!२
मारित मारित वरेन मरणा
स्वातंत्र्यास्तव घेइन जनना
शत्रुंजयवृत्ती तर माझ्या तनातुनी उसळे!३
अष्टभुजे तुज ठेवुनि साक्षी
उच्चारित मी आज प्रणासी
मेलो तर हौतात्म्य लाभते, श्रेय जरी नच मिळे!४
का न चालवू मी कार्या ते?
का न स्वीकरू सती व्रताते
सशस्त्र युद्धी सैनिक होता करिन धन्य आयु सगळे!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment