Saturday, March 21, 2009

शांत झोपू दे भारतमाते.

संकटांचे झंझावात येत होते नी जात होते. पण सूर्यकुलातील वंशवेलीचं ते फूल अजून सतेज होते. मातृभूमी आणि मातृभूमीचं स्वातंत्र्य यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या महामानवाची महापूजा अजून तेजस्वी होती. सागर, आकाश आणि तेज यावर प्रेम करणारं ते महामानवाचं महान मन आता झुकलं होतं. झुकलं होत जमिनीकडे. धरणीमातेकडे..

महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या जीवनाची भैरवी स्वतः गात होते. आयुष्यातला प्रत्येक श्वास ज्या भारतमातेच्या स्मरणाने त्यांनी घेतला त्या आपल्या भारतमातेला ते विनवीत होते -

शांत झोपू दे भारतमाते

शिणली गात्रे, थकले मनही 
अधिक काहि गे सहवत नाही 
तव अंकावर परमवत्सले 
शांत झोपु दे भारतमाते। 
निजव निजव गे भारतमाते ।।१।। ।। ध्रु. ।।

नको अन्न मज नको उदकही 
विमल होऊ दे नश्वर तनुही 
ये मृत्यो। संकोच कशाला? 
घे हाती माझिया कराते ।।२।। 

आम्ही जातो अमुच्या गावा 
विनम्र वंदन सकला कळवा 
कृतज्ञतेने मन भारावे, 
घे कुशीत गे मज भारतमाते ।।३।।
 
नेत्रि पाहिला स्वतंत्र भारत 
ऐकतसे विजयाची नौबत 
खंडित भूमि अखंड होवो, 
हेच इच्छितो सिंधू-सरिते ।।४।। 

हे शरीर भारभूत कोणाते नच व्हावे
मीच स्वये आनंदे ब्रह्मांडी विलयावे 
धन्य मी, कृतार्थ मी, 
अपुलेसे गे कर मज माते ||५||

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

सातवे सोनेरी पान.


१९६५ भारत पाक संघर्षाचं ते तेजस्वी पर्व. भारतीय फौजांनी आगेकूच करायला प्रारंभ केला. भारताला कणखर नेतृत्वाचा अनुभव येऊ लागला. कोण हा नेता? लाल बहादुर शास्त्री, क्षणाक्षणांनी विजयी वार्ता येऊ लागल्या. स्वातंत्र्यवीरांचं क्षात्रतेजही उफाळून येऊ लागलं. भारतीय फौजेला त्यांनी आदेश दिला आणि आशीर्वादही दिला-

भारतभूच्या नरवीरांनो
यशवंत व्हा, जयवंत व्हा!ध्रु. 

युद्धाचे मिळतसे निमंत्रण
जयरणचंडी घुमु दे गर्जन
अर्ध्यावरती नकाच थांबू,
चंद्रगुप्त व्हा, नृसिंह व्‍हा!१

पापस्तानी भूमीवरती
झडू देत त्या विजय नौबती
विभाजनाचे पुसण्या लांछन
पर्वकाल पातला नवा!२

आज संचरे तनि वीरश्री
बहादुराची उजळ मुखश्री
कणखर नेतृत्वाचा अनुभव
पुन्हा भारता हवा हवा!३

काळ कौल दे माझ्या तत्त्वा
प्रताप करितो सार्थ सुतत्त्वा
पान सातवे हे सोनेरी,
लिहिण्यास्तव पेटे वणवा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

सोने माईचे झाले.

सोने माईचे झाले

त्या महाकाव्याचा आता अखेरचा सर्ग चालू होता. त्या महान ग्रंथाची पानं झपाझप उलटत होती... माई आजारी होत्या. कसलीशी चाहूल लागली... दाराजवळ पावलं वाजली... काळाची पावलं होती ती.

माई गेल्या... नंदादीप विझला.. तिचं सोनं झालं ।

वाजली काळाची पाउले 
सोने माईचे झाले!ध्रु.

स्वतंत्र भारत तिजला दिसला 
कधी नव्हे तो प्रपंच केला
अहेवपणिचे मरण सुदैवे, साध्वीते लाभले!१

जन्मभरीची सोबत केली
सुख-दुःखांशी समरस झाली
कुणीतरी पथि पुढती जाणे कधीच की ठरले!२

चंदनवाडी ते चंदन न्या 
अनंतास पोचवा सुकन्या 
श्रम कुठलेही मुळि न सोसवत, शरिर मम शिणले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

अंती मजला एक सांगणे.


१९६० मृत्युंजय दिनाचा समारंभ होता. त्या स्वातंत्र्यवीरांची वाणी ऐकायला पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो लोक जमले होते. सभेत ते म्हणाले –

मज सत्तेची तिळहि न इच्छा
ना शिवली चित्ता अभिलाषा!
परि निश्चये एक सांगतो - स्वतंत्र भारतभूचा पहिला राष्ट्रपती जर झालो असतो,
केल्या असत्या सीमा निश्चित!
पूर्वीच्या सरसीमा निजहृदि
पुनः पुन्हा आणुनिया सांप्रत
निर्जनभूची हिंदुभूमि मी, केली असती थोड्या अवधित!

माझ्या देशी प्रति युवकाला –
सैनिकि शिक्षण मिळले असते
विज्ञानाच्या महात्मतेने, ज्ञानविश्व हे विकसित होते!
द्या अवधी मज दोनच वर्षे
रशियाहुनही बलाढ्य माझा, देश आपणा करून दाखविन!  

कधीपासुनी विश्व असे हे
कधीच नाही बदलायाचे
जगता कळते सामर्थ्याची एकच भाषा
शस्त्रबळावर तोल सावरे विश्वशांतिची निर्मळ आशा!

मला जाणवे तुमचा प्रेमा !
हात जोडुनि परी विनवितो -
जीर्ण शरिरि या त्राण नसे हो -
मनोमनी मज भेटत जाहो!

अंती मजला एक सांगणे
शस्त्रबळा वाढवा - वाढवा
विज्ञानाच्या प्रयोगशाळा, प्रांतोप्राती असंख्य फुलवा
युद्धोत्सुक नवयुवका बनवा!
हिंदुराष्ट्र हे समर्थ घडवा, हिंदु राष्ट्र हे समर्थ घडवा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

रे हिन्दुधर्मा.


१९५६ साली पुण्यातील रमणबागेत भाषण करताना, धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे तत्त्व सावरकरांनी मांडले, राष्ट्राला धर्म अत्यावश्यक असल्याची जाणीव दिली. हिंदुधर्माला त्यांनी इशारा दिला -

हिंदुधर्मा रे खुळ्या, सहनशक्ती विसर रे
आण चित्ती क्रोध रे!ध्रु.

अन्याय कैसा साहशी?
सुस्त कैसा झोपशी?
धर्म बदले -राष्ट्र बदले, 
तत्त्व इतुके जाण रे!१

रात्र वैऱ्याची दिसे
सामर्थ्य तव कोठे असे?
बिंदु बिंदू मिळुनि सिंधू, हिंदुराष्ट्रा उभव रे!२

क्रोध म्हणजे जागृती
शांतवृत्ती सोड ती
मुर्दाडपण टाकून दे - प्रतिकारवृत्ती फुलव रे!३

धर्म जगता राष्ट्र राहे
धर्म तर इतिहास आहे
धर्माविना पृथ्वीवरी राष्ट्र क्षण ही नच उरे!४

शरिरि जैसा प्राणवायू
तुजमुळे वाढेल आयू
सामर्थ्य अन् संजीवनी तू, दिव्यता तव जाण रे!५


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

सिन्धु, तुला विसरु कसा?


अभिनव भारताचा सांगता समारंभ चालू होता. सावरकरांच्या कल्पनेनं भूतकालात झेप घेतली. साऱ्या प्राचीन गोष्टी त्यांना आठवल्या. वेदकाल आठवला.... आणि आठवली सिंधुसरिता. ऋषिवर्यांना वेदातील ऋचांची स्फूर्ती देणारी सिंधुसरिता; तपस्वी पुरुषांना तप करण्याचं सामर्थ्य देणारी सिंधुसरिता आणि पराक्रमी पुरुषांना पराक्रमाची प्रेरणा देणारी सिंधुसरिता. त्या आठवणींनी तो महर्षी, तो महातपस्वी – तो महापुरुष गहिवरला... त्यांच्या तोंडून पावन सिंधुमातेचं स्तोत्र स्फुरू लागलं... झरू लागलं... 

 

सुरसेविनी, विसरू कसा?
सिंधू, तुला विसरू कसा? ।। धुः ।।

स्नान प्रत्यही मी आचरिता
नाम सहज जिव्हाग्री येता
एक जाणवे तुज अंतरलो – हा जीव तत्क्षणी होत पिसा!१

अवघे जगत् जरि द्वेषिते
विसरू कसा तुज सिंधुते
तुजवीण हिंदू कधि संभवे का – उमटे मनी देवी ठसा!२

तुझ्याच काठी ऋषी मुनींनी
सुदर सूक्ते प्रेमे रचुनी
भक्तिभरे किति आळवली गे ऐशा तुला विसरू कसा?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

अग्निदिव्य.

गांधींच्या हत्येसंबंधीच्या खटल्यातून सावरकर निर्दोष, निष्कलंक सुटले. त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या पर्वातील ती जणू अग्निपरीक्षाच. सोन निकषाला उतरलं आणि अधिकच तेजानं झळकू लागलं.


सोने निकषाते उतरले, अधिकचि तेजे ते झळकले!ध्रु.

स्वतंत्र देशी नाहि वंदना
परि टळली ही मानखंडना
अग्निदिव्य हे फार अलौकिक, कुणि न जगि हे साहिले!१

भांडण असते जगि तत्त्वांचे
कधीहि नसते व्यक्ति व्यक्तिंचे
असंख्य अनुयायांनी मोदे, वीरा अभिवादिले!२

पतिव्रता त्या जानकीसही
अग्निपरीक्षा चुकली नाही
इथे विसरलो झाले गेले, भाव न कटु उरले!३

क्षमाशील हा उदार आत्मा
कृती ठरविते त्यास महात्मा
महामनाच्या चरणांवरती, पडुन धन्य होतील फुले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन