Thursday, March 5, 2009

पत्रोत्तर.

सतीचं वाण घेतलेल्या सावरकर कुटुंबाविरुद्ध ब्रिटिश सरकारच उभं राहिलं होतं... आणि त्याचा परिणाम म्हणजे, सावरकरांचे थोरले भाऊ गणेशपंत सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. धाकटे भाऊ नारायणराव सावरकर यांना अटकेत ठेवण्यात आलं... आणि तात्यांच्या भोवतीही परदेशात सुडाचं चक्र गरगरत होतं.

अशा परिस्थितीत येसू वहिनींची स्थिती काय झाली असेल? ती मनस्थिती तात्यांनी जाणली; डोळ्यातील आसवं सावरीतच पत्र लिहायला घेतलं –


पत्र तुझे पावले, वत्सले, वहिनी तुज वंदिले!ध्रु.

अग्रज माझा विजनी गेला
अनुज असा बाहेर राहिला
रामाविण जानकी एकली, ढाळत अश्रूफुले!१

वंश धन्य जाहला जाहला
देशकार्यि वठताना फुलला
धन्य पुष्प जे गजेंद्रराये, हरिचरणी वाहिले!२

तू धैर्याची सोज्वळ मूर्ती
तूच माझि गे पावन स्फूर्ती
सेवाव्रत आश्रया तव तनी, येउनिया राहिले!३

सांत्वन कैसे करू प्रेमले?
जे सुचले ते पत्री लिहिले
त्यागमयी आराध्यदेवते, कर माझे जुळले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

No comments:

Post a Comment