स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेचा तो दिवस होता. मरणाच्या सीमेतून पुन्हा जीवनाच्या सीमेवर ती पावले पडत होती. त्यांना भेटण्यास बंदीजनांनी गर्दी करू नये म्हणून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण त्याला न जुमानता एक जमादार पुढ सरसावला आणि त्यानं रानफुलांचा हार स्वातंत्र्यवीरांच्या गळ्यात घातला अवघी सात फुल होती हारामधे पण, अंतःकरणातल्या असीम आदराचं ते प्रतीक होतं. तो सन्मान सावरकर कधीही विसरले नाहीत.
कंठी रानफुलांचे हार! कानी अमुचा जयजयकार!
जन्मांती नच विस्मरेन हा, हार्दिक हो सत्कार!ध्रु.
स्नेहा आपुल्या हृदी जागविन
आपुलकीचे गीत आळविन
सुगंध मन-गाभारी कोंदे, मानु कसे आभार ?१
आज आठवे भोळी शबरी
दिल्या फळांची चवही न्यारी
हृदय गातसे परमानंदे, गीत होत साकार!२
बंदिगृहाचे दार उघडले
दर्शनार्थ मन वेडे झाले
मुक्त अम्ही परि बद्ध मायभू, दुःख वाटते फार!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment