कारागाराच्या भिंतींनी स्वातंत्र्याची भावना बंदिस्त करता येईल का? कारागाराच्या भिंतींनी प्रबल बुद्धिमत्तेला बंधन घालता येईल का? कारागाराच्या उन्मत्त भिंतींना महाकवीची प्रतिभाशक्ती आणि समाजचिंतकाची विचारशक्ती जुमानील काय? शक्य नाही. कधीही शक्य नाही.
आणि म्हणून कारावासानंतरसुद्धा अंदमानच्या कठोर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना साऱ्या हिंदुस्थानला प्रभावित करणारा हिंदुत्वाचा महान मंत्र त्या द्रष्ट्या महर्षीनं दिला -
"आसिंधु-सिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका पितृभूः पुण्यभूःश्चैव सवै हिंदुरिति स्मृतः"
आसिंधु सिंधुपर्यंत पसरली ही भारतभूमी
जो पुत्र तिचा, जो भक्त तिचा त्या हिंदू मानत मी!ध्रु.
हिंदु शब्द राष्ट्राचा बोधक
नसे मुळी पंथाचा वाचक
संस्कृतिचे जे बंधन कोमल, मृदुल असे रेशमी!१
हा देश रामकृष्णांचा
हा देश प्रतापशिवांचा
हिंदु अस्मिता नसानसातुन, खेळतसे नेहमी!२
मग असु दे पंथहि कुठला
भेदाचा प्रश्नच नुरला
इंद्रधनुच्या रंगासमही, खुलली विविध परींनी!३
राष्ट्राचा पाया जनता
ती जनाजनातिल ममता
एक आचरण एकच चिंतन, एकच ध्येय मनी!४
जरि बोली दिसति अनेक
हृदयांची भाषा एक
इतिहास एक, भूगोल एक, भावैक्य जागते मनी!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment