१३.३.१९१० रोजी वीर सावरकरांना अटक करण्यात आलं. राजद्रोह आणि खुनास मदत असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया स्टेशनवर एक फरारी आरोपी म्हणून त्यांना ब्रिटिश सरकारनं ताब्यात घेतलं. सिंहच पिंज-यात सापडला. शत्रूच्या ताब्यात सापडल्यावर भवितव्य ठरलेलंच होतं. हाल, यातना, कठोरातील कठोर शासन, मनस्ताप, दुःख यांची न संपणारी चक्र आता त्यांच्या मागे सुरु होणार होती. क्षणाक्षणाला ती पोलादी पकड घट्ट होत होती अन आशा मावळत होत्या.
पण तेजाच्या उपासकाला निराशेचा अंधार कधीच माहीत नसतो. अशाही अवस्थेत ब्रिक्स्टनच्या तुरुंगातून आपल्या मित्रांचा निरोप घेतला. त्या पत्रातला प्रत्येक शब्द आशावादाच्या तेजात न्हालेला होता. ते म्हणतात -
प्रत्येकाची ठरे भूमिका
त्यासाठी हा विरह असे का?
दिली भूमिका उत्तम वठवू असू, नसू राहूहि अनाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!१
इतिहासाच्या रंगमंदिरी
असंख्य पात्रे जमली सारी
कृतज्ञ प्रेक्षक करतिल कौतुक, ध्वनि कानी स्वीकरू प्रणाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!२
काळ पाहतो सत्वपरीक्षा
पडतिल विजनी अस्थीरक्षा
स्वतंत्र भारत वृत्त ऐकता, त्या तेजाचे ठरतील धाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!३
मेघपटल हे नच नित्याचे
गगन कोंदले उजळायाचे
धगधगत्या स्वातंत्र्यरवीस्तव, नित्य तयाचे घेऊ नाम
पुनर्भेट होईल तरीही, घ्या मित्रांनो रामराम!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment