१९६५ भारत पाक संघर्षाचं ते तेजस्वी पर्व. भारतीय फौजांनी आगेकूच करायला प्रारंभ केला. भारताला कणखर नेतृत्वाचा अनुभव येऊ लागला. कोण हा नेता? लाल बहादुर शास्त्री, क्षणाक्षणांनी विजयी वार्ता येऊ लागल्या. स्वातंत्र्यवीरांचं क्षात्रतेजही उफाळून येऊ लागलं. भारतीय फौजेला त्यांनी आदेश दिला आणि आशीर्वादही दिला-
भारतभूच्या नरवीरांनो
यशवंत व्हा, जयवंत व्हा!ध्रु.
युद्धाचे मिळतसे निमंत्रण
जयरणचंडी घुमु दे गर्जन
अर्ध्यावरती नकाच थांबू,
चंद्रगुप्त व्हा, नृसिंह व्हा!१
पापस्तानी भूमीवरती
झडू देत त्या विजय नौबती
विभाजनाचे पुसण्या लांछन
पर्वकाल पातला नवा!२
आज संचरे तनि वीरश्री
बहादुराची उजळ मुखश्री
कणखर नेतृत्वाचा अनुभव
पुन्हा भारता हवा हवा!३
काळ कौल दे माझ्या तत्त्वा
प्रताप करितो सार्थ सुतत्त्वा
पान सातवे हे सोनेरी,
लिहिण्यास्तव पेटे वणवा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment