अंदमानच्या अंधेरीत दुर्दैवाच्या भीषण चक्राची करकर चालू होती. निराशेचे काळेकुट्ट ढग मनाला व्यापून, उरतच होते. ज्या आपल्या सर्वसमर्थ बुद्धीनं एखादं राष्ट्र संपन्न व्हावं ती आपली बुद्धी, शरीर अन् मन एखाद्या तेलाच्या घाण्याभोवती निर्बुद्ध फेऱ्या घालत पिचत पडावीत ना ? छे, छे! करून टाकावा या जीवनाचा अंत. अशा विचारांच्या आंदोलनांनी मनात काहूर उठे -
पृथ्वीची गती गोल! सूर्यचंद्रांची गती गोल! या अनंत विश्वात कोलूची गरगर कोण्या झाडाचा पाला!
माणसाचे जीवन-मृत्यूही चक्राकारच! सूर्यचंद्र बिनबोभाट फिरलेच पाहिजेत, मलाही कोलू फिरवलाच पाहिजे, कारण मीही कालचक्राचा घटकच आहे!
जन्मणेच जर नाही माझ्या हातात - तर मीच मला मारावे का म्हणून?
अरे वेड्या मना!
सोड हा अहंकार, एकवट सारे बळ, तुझ्या कोलूची एकच फेरी – ठरेल शत्रुघाती सुदर्शनाची एक फेरी! आत्महत्या करणे म्हणजे शत्रूला साह्य होणे!
कार्य उरलं, अवतार संपला. असे कधी झाले आहे काय? जर जीवन धन्य तरच मरण धन्य! मलाही माझे जीवन धन्य केलेच पाहिजे – स्वातंत्र्यझुंजीतील तुरुंगाचे ठाणे लढवून! हे श्रीरामा! ध्येयासक्ती दे! हनुमंता शक्ती दे, निष्ठा दे! माझ्या अंधा-या जीवनात प्रतापसूर्य उगवू दे!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment