प्लेगचा वणवा भगूरपर्यंत येऊन पोहोचला, सारा गाव मृत्यूच्या काळ्याकुट्ट छायेनं व्यापला होता. यमराजाच्या यज्ञसत्रात एक एक आहुती पडू लागल्या. त्यातून सावरकरांचं घर तरी कसं सुटावं?
प्लेगामुळेच झाले, घर निर्मनुष्य सारे
पसरेच मृत्युछाया-भयग्रस्त मात्र सारे!ध्रु.
द्या हो कुणी कुठूनी, मज एक घोट पाणी
अण्णास वात झाला - वास्तु कशी थरारे!१
एकेक घास मृत्यू, लागे मजेत खाऊ
रडणे सुचे न कोणा, कोंदाटलेत वारे!२
आक्रंदतात कुत्री, यमराजयज्ञसत्री
प्लेगास सर्व रुचले - अबला नि सान पोरे!३
ती नित्य पेटलेली, सरणे कधी न विझली
या देहि याच डोळा, मृत्यूस देखिले रे!४
काहीच की सुचेना, शब्दात सांगवेना
कल्पांत मांडलेला, बसलो पहात सारे!५
संहार संपवोनी, फिरवी मुखावरुनी
ती जीभ काळव्याघ्र - तृप्तीत गुरगुरे रे!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment