"माई, ओळखलं का मला?" तात्यांचे हे शब्द ऐकून तुरुंगाच्या भिंतीसुद्धा कंपित झाल्या असतील.
दोन जन्मठेपांच्या शिक्षा फर्मावल्यानंतर डोंगरीच्या तुरूंगात, माई भेटायला आल्या होत्या वीर सावरकरांच्या वीरपत्नी भेटायला आल्या होत्या. आपला चार वर्षाचा मुलगा प्रभाकर वारला होता, ते सारं दुःख गिळून ती वीरमाता भेटायला आली होती.
सावरकरांना निरोप दिला तो आशासंपन्न क्षण त्यांना आठवला. त्यावेळी रचलेली सारी स्वप्नं डोळ्यांपुढे तरळून गेली; पण ती सारी भंगली होती. बॅरिस्टरच्या डौलदार पोषाखात जे दिसणार होते ते आज कैद्याच्या पोषाखात समोर होते. जन्माचा साथीदार जन्मठेपांच्या शिक्षा भोगत होता.
दोघाच्यामध्ये तुरुंगाचे गज होते आणि उभी होती दुर्देवाची अभेद्य भिंत.
पण, कणखर मनांना तुरुंगाच्या गजांची आणि दुर्दैवाच्या भिंतींची पर्वा असते थोडीच ? म्हणून तर सहजतेनं तात्या म्हणाले –
ओळखले का मला? माई ओळखले का मला!ध्रु.
वस्त्र पालटे तोच मी परी
दिसु दे मुद्रा तुझी हासरी
हृदयि उसळल्या डोंबावरती शिंपड सुस्मित जला!१
असेल इच्छा दयाघनाची
सरेल ताटातुटी जिवांची
तोवरि असल्या भातुकलीचा मोहच मी सोडिला!२
वंशाचा जरि दीपक विझला
समज धन्य अभिमन्यू ठरला
राष्ट्रप्रपंचासाठी अपुला खेळ स्वये उधळला!३
धीर कोठुनि आला तुजला?
अश्रू एकहि नयनि न दिसला
वीरस्त्री तू आचरणाने धैर्यपाठ शिकविला!४
श्रीकृष्णाते स्मरेन निशिदिनि
बेड्यांचाही ताल धरूनी मी
तारकमंत्रा जपेन बरं का, मंत्र तुझा मानला
ओळखले ना मला? माई ओळखले मी तुला!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment