ब्रिक्स्टन च्या तुरूंगातून स्वातंत्र्यवीरांना १.७.१९१० रोजी मोरिया बोटीने गुप्तपणे हलविण्यात आलं. सावरकरांच्या मनात विचारांचं वादळ चाललं होतं. सागराचा जसा थांग लागत नव्हता तसा त्यांच्या मनाचाही थांग लागत नव्हता. शेवटी ८ जुलै १९१० ला सावरकरांनी मार्सेलिस बंदराजवळ जगाला स्तंभित करणारी, सागरालासुद्धा विस्मित करणारी उडी मारली. पण दुर्दैव.. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना पकडून पुन्हा त्याच बोटीवर बंद करण्यात आलं.
त्या अपयशानं उरी खिन्नता दाटली. मातृभूमी डोळ्यांसमोर उभी राहिली. स्वातंत्र्याचं स्वप्न क्षणभर तरळलं अन् डोळे पाण्यानं डबडबले. मातृभूमीची क्षमा मागायला हात जोडायचे म्हटलं तरी ते मोकळे नव्हते; बेड्या पडल्या होत्या हातात. त्यांनी मस्तक झुकवलं नि म्हटलं –
क्षमस्व माते, क्षमस्व माते
क्षमा करी गे भारतमाते!ध्रु.
तव मोक्षाच्या धरूनी ध्यासा
प्रवर्तलो करण्यास साहसा
हाय परंतू दैव उलटले
बंधनात कर गुंतत माते!१
शिवरायाला मिळे उजळ यश
भाळी माझ्या का गे अपयश ?
युयुत्सु मन हे अता उळमळे –
पदांखालची धरती हलते!२
वैनतेय होण्यास निघालो
छिन्नपक्ष परि जटायु झालो
वंदनासही कर न मोकळे –
त्यास्तव मस्तक माझे झुकते!३
दुस्तर तम सरणार कधी हा?
प्रश्न ठाकतो मम चित्ती हा
उदंड कष्टा साहिन सौख्ये
नको सुदैवा होउस परते!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment