Saturday, March 21, 2009

शांत झोपू दे भारतमाते.

संकटांचे झंझावात येत होते नी जात होते. पण सूर्यकुलातील वंशवेलीचं ते फूल अजून सतेज होते. मातृभूमी आणि मातृभूमीचं स्वातंत्र्य यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या महामानवाची महापूजा अजून तेजस्वी होती. सागर, आकाश आणि तेज यावर प्रेम करणारं ते महामानवाचं महान मन आता झुकलं होतं. झुकलं होत जमिनीकडे. धरणीमातेकडे..

महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या जीवनाची भैरवी स्वतः गात होते. आयुष्यातला प्रत्येक श्वास ज्या भारतमातेच्या स्मरणाने त्यांनी घेतला त्या आपल्या भारतमातेला ते विनवीत होते -

शांत झोपू दे भारतमाते

शिणली गात्रे, थकले मनही 
अधिक काहि गे सहवत नाही 
तव अंकावर परमवत्सले 
शांत झोपु दे भारतमाते। 
निजव निजव गे भारतमाते ।।१।। ।। ध्रु. ।।

नको अन्न मज नको उदकही 
विमल होऊ दे नश्वर तनुही 
ये मृत्यो। संकोच कशाला? 
घे हाती माझिया कराते ।।२।। 

आम्ही जातो अमुच्या गावा 
विनम्र वंदन सकला कळवा 
कृतज्ञतेने मन भारावे, 
घे कुशीत गे मज भारतमाते ।।३।।
 
नेत्रि पाहिला स्वतंत्र भारत 
ऐकतसे विजयाची नौबत 
खंडित भूमि अखंड होवो, 
हेच इच्छितो सिंधू-सरिते ।।४।। 

हे शरीर भारभूत कोणाते नच व्हावे
मीच स्वये आनंदे ब्रह्मांडी विलयावे 
धन्य मी, कृतार्थ मी, 
अपुलेसे गे कर मज माते ||५||

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

1 comment: